-->

Ads

शाळा बुडवली, वडिलांच्या भीतीने घर सोडलं, नाव बदलून अनाथालयात राहिला; अखेर नाट्यमय प्रवासाचा शेवट?

 कार्तिक पंधरा दिवसांपासून शाळेत गेलाच नाही, त्याने आपल्या मित्रांसोबत फिरण्यात वेळ घालवला. शाळेतून कर्तिकच्या गैरहजेरीबाबत त्याच्या घरी कळवण्यात आले. ही बाब कार्तिकला समजल्याने आता आपल्याला वडील मारतील?

अहमदनगर: वाईट मित्रांची संगत लागली, त्यातून शाळा बुडवली. शाळेतून घरी कळविण्यात आल्यावर आता वडील रागावतील म्हणून घरातून पळून गेला. त्यातही अनेक अडचणी आल्या. पोलिसांनी पुण्यातील अनाथगृहात दाखल केल्यावर तेथे खोटे नाव सांगून त्याच नावाने वावरला. शेवटी पोलिसांना त्याचे खरे नाव आणि पत्ता शोधून घरी पोहचविण्यात यश आले.


घरातील वातावरणाचा मुलांवर कसा परिणाम होतो? मुलांच्या मनात भीती निर्माण झाल्यावर कोणती टोकाची भूमिका घेतात? प्रसंगी स्वतःचे नाव बदलून घरापासून कायमचा निरोप घेण्याचा विचार कशी करतात? अशा नानाविध अनुत्तरित प्रश्नांनी भरलेला एका कार्तिक (बदललेले नाव) नावाच्या शाळकरी विद्यार्थ्याच्या नाट्यमय प्रवास मानवी मनाला भेदणारा आहे. घरातून निघून गेलेला हा मुलगा शेवटी कोतवाली पोलिसांनी नगरला आणून त्याच्या पालकांच्या ताब्यात दिला.

कार्तिक पंधरा दिवसांपासून शाळेत गेलाच नाही, त्याने आपल्या मित्रांसोबत फिरण्यात वेळ घालवला. शाळेतून कर्तिकच्या गैरहजेरीबाबत त्याच्या घरी कळवण्यात आले. ही बाब कार्तिकला समजल्याने आता आपल्याला वडील मारतील? या भीतीने घरी न जाता आई काम करत असलेल्या एका हॉस्पिटल येथून थेट नगरच्या रेल्वे स्थानकावरून बिहार रेल्वेने कोपरगावपर्यंत गेला. गाडीत बिहारी नागरिक मारतील या भीतीने तिथून रेल्वेने पुण्याला गेला. पुण्यात त्याला घर सोडून आलेले आणखी तिघे भेटले. सर्वजण ठरवून पुन्हा कोल्हापूरला गेले. कार्तिक हा रेल्वेने तिथून मडगांव गोवा या ठिकाणी गेला. त्याठिकाणी नाश्ता करण्यासाठी त्याकडे पैसे नसल्याने हॉटेल मालकाने चौकशी केली. त्यावेळी त्याने अहमदनगर येथून पळून आल्याचे सांगितले. हॉटेल मालकाने स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी ताब्यात घेत त्याला अपना घर होस्टेल येथे दाखल केले. मात्र, हॉस्टेलमधल्या मुलांनी त्याला सांगितले की, खरे नाव सांगितल्यावर ४-५ महिने येथेच थांबवतील पण खोटे नाव सांगितल्यावर २-३ दिवस शोध घेतील आणि सोडून देतील. म्हणून त्याने आपले नाव वैभव बनकर असे सांगितले. 'अपना घर' येथे असताना कार्तिक आणि त्याच्या मित्रांना काही विधी संघर्षग्रस्त मित्रांकडून त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी बाल कल्याण समिती बोर्ड बसल्यावर तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना मातृछाया बालकल्याण आश्रम फोंडा गोवा येथे दाखल करण्यात आले. तेथुन कार्तिक आणि त्याचे तीन मित्र पळाले.
कार्तिक ९ जानेवारी रोजी दादर रेल्वे स्टेशन मुंबई येथे आला. दादर पोलिसांनी त्याला बाल कल्याण समिती मुंबई येथे हजर करून डेव्हिड ससून औद्योगिक शाळा माटुंगा येथे दाखल केले. तो दादर येथे असल्याबाबत कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली. ११ जानेवारी रोजी पत्रव्यवहार करून कोतवाली पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी त्याला पेढे भरवून त्याचे स्वागत केले. कार्तिक ने पुन्हा असे कधीच वागणार नाही अशी ग्वाही दिली.
मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक राकेश ओला अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलिस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलिस उपनिरीक्षक अश्विनी मोरे पोलि जवान संदीप पितळे योगेश भिंगर्दिवे सलीम शेख अमोल गाडे यांचे सोबतच मुलाचे आई वडील यांनीही प्रयत्न केले होते.

यासंबंधी कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले, सर्वाधिक शोध आम्ही या मुलाचा घेतला. आई-वडील नसल्यावर काय अवस्था होते याची प्रचिती कार्तिकला आली आहे. त्याच्या काही अल्पवयीन मित्रांनी पैशासाठी चोरी केली होती. त्यांची वेळीच साथ सोडली. आई वडील सुद्धा मुलाच्या चांगल्यासाठी रागवतात मारतात परंतु मुलांच्या मनामध्ये आदरयुक्त भीती असावी फक्त माराची भीती नको.

कार्तिकचे वडील म्हणाले, माझी सर्व पालकांना विनंती आहे मुलांवर बाहेरचा ताण काढू नये.त्यांना वेळ द्या, मैत्री करा, त्यांचे म्हणणे जाणून घ्या. आपल्याशी बोलताना संकोच वाटणार नाही एवढे त्यांच्याशी एकरूप व्हा. आपल्या वागण्या बोलण्यात त्यांच्या मनावर परिणाम होतो.आपल्याबाबत भीती निर्माण होऊन ती वेगळाच निर्णय घेतात. त्यामुळे आपण आणखी खचून जातो.




Post a Comment

0 Comments