-->

Ads

Goregaon Fire: गोरेगाव दुर्घटनेनंतर सरकारला खडबडून जाग, महापालिकेचे अग्निशमन दलाला महत्त्वाचे आदेश

Mumbai News: शुक्रवारी गोरेगाव पश्चिमेकडील जय भवानी या सात मजली इमारतीला भीषण आग लागली. या दुर्घटनेत बऱ्याच निष्पाप लोकांचा जीव गेला. कुणाच्या संसाराची राख झाली तर कुणी आपली नातवंडे गमावली.



मुंबई : गोरेगाव पश्चिमेकडील जय भवानी या सात मजली एसआरए इमारतीला भीषण आग लागून रहिवाशांनी जीव गमावल्यानंतर राज्य सरकारला खडबडून जाग आली आहे. या दुर्घटनेनंतर एसआरए इमारतींमधील अग्निसुरक्षा यंत्रणेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर एसआरए इमारतींमधील अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार मुंबईच्या अग्निशमन दलाने या आठवड्यापासून अग्निसुरक्षा तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत एसआरएच्या चार ते पाच हजार इमारती आहेत. त्यामुळे या इमारतींची अग्निशमन सुरक्षा तपासणी करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

एसआरए इमारत पूर्ण होऊन त्याला ओसी मिळाल्यानंतर त्या इमारतीची पहिली तीन वर्षे संपूर्ण जबाबदारी ही एसआरए आणि विकासकाची असते. त्यानंतर देखभाल, दुरुस्ती आणि सुरक्षेची जबाबदारी ही संबंधित सोसायटीची जबाबदारी असते. त्यानंतरही अनेक सोसायट्या अग्निसुरक्षा यंत्रणा बसवण्याकडे दुर्लक्ष करतात. गोरेगावमधील आग लागलेल्या इमारतीत कोणतीही अग्निसुरक्षा यंत्रणा नव्हती. या घटनेनंतर शिंदे यांनी मुंबईतील एसआरए इमारतींमधील अग्निसुरक्षा यंत्रणांची तपासणी करण्याच्या सूचना संबंधित विभागांना केल्या.

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर एसआरए इमारतींची सुरक्षा तपासणी करण्याच्या सूचना अग्निशमन दलाला केल्याचे मुंबई महापालिकेचे सह आयुक्त रमेश पवार (सुधार) यांनी सांगितले. त्यानुसार येत्या आठवड्यात अग्निशमन दलाकडून तपासणीला सुरुवात करण्यात येणार आहे. दोन ते तीन दिवसांत तीन ते चार इमारती तपासण्याचे नियोजन आहे. मात्र यावर अंतिम निर्णय होणार आहे. इलेक्ट्रिक वायर, अग्निरोधक यंत्रणा कार्यरत आहेत की नाही आदींची तपासणी करण्यात येईल. त्यात त्रुटी असल्यास अग्निरोधक यंत्रणा बसविणे किंवा त्या कार्यरत करण्यासाठी साधारण एक महिन्याची मुदतही देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

मुंबईत झोपडपट्टीत राहणाऱ्यांची संख्याही लाखोंच्या घरात आहे. त्यांचा पुनर्विकास करताना एसआरए घरे बांधली जात आहेत. १९९५मध्ये ही योजना सुरू झाली. आतापर्यंत अडीच लाख झोपडीधारकांचे पुनर्वसन एसआरएकडून करण्यात आले आहेत. यासाठी चार ते पाच हजार एसआरए इमारती उभारण्यात आल्या आहेत. सात मजल्यांपासून ते २२ मजल्यांपर्यंत आणि त्यापुढे या इमारती उभ्या आहेत. २४ मीटरपेक्षा जास्त उंच इमारत असेल, तरच त्याला अग्निसुरक्षा यंत्रणा बसवणे बंधनकारक असते. काही एसआरए इमारती या २४ मीटरपेक्षा उंच नाहीत. यामध्ये गोरेगावमधील आग लागलेली इमारत ही सात मजली होती आणि २४ मीटरपेक्षा उंच नव्हती.

अग्निशमन दलात मनुष्यबळाचा अभाव

मुंबई अग्निशमन दलात सध्या मनुष्यबळाचा अभाव आहे. मुंबई अग्निशमन दलाला अग्निशामक जवानांची गरज असून सध्या १,४०० पेक्षा जास्त जवान सेवेत आहेत. सध्याचे अपुरे मनुष्यबळ लक्षात घेत ९१० रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार जानेवारी २०२३ पासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. ९१० पैकी पात्र ठरलेल्या ८७३ उमेदवारांचे सध्या प्रशिक्षण सुरू असून ते जानेवारी २०२४ पासून टप्प्याटप्यात सेवेत येतील. त्यामुळे सध्या तरी १,४०० जवानांवरच भार आहे.




अन्य इमारतींच्या अग्निसुरक्षेचे काय?

२८ ऑगस्ट २०२३ रोजी सांताक्रूझ पूर्व येथील गॅलेक्सी हॉटेलमध्ये आग लागली होती. आगीच्या दुर्घटनेत गुजरातमधील एका दाम्पत्यासह एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. हे जोडपे एनआरआय होते. तिघांचा मृत्यू झाल्यानंतर मुंबई महापालिकेनेही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर हॉटेलमधील अग्निसुरक्षेची तपासणी केली जाणार होती. मात्र ती अद्यापही होऊ शकलेली नाही.


 

Post a Comment

0 Comments