-->

Ads

सदावर्तेंच्या वाहनांच्या तोडफोडीवर मनोज जरांगेंनी मांडली भूमिका; म्हणाले, “मराठा समाज…!”

जरांगे पाटील म्हणतात, “मराठ्यांच्या विरोधात हे सरकार म्हणून किती दिवस तुम्ही काम करणार? बघतो आम्ही तुम्ही आरक्षण कसं देत नाही. कसं देत नाही तेच आम्ही बघतो”


मराठा आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी महिन्याभरापूर्वी बेमुदत उपोषण केलं होतं. राज्य सरकारने महिन्याभरात आरक्षणाचा निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आरक्षण मागे घेतलं. मात्र, ती मुदत उलटल्यानंतर आता पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. यादरम्यान मराठा आरक्षणाबाबत विरुद्ध भूमिका घेणारे गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्या काही व्यक्तींनी फोडल्याचं समोर आलं आहे. त्यासंदर्भात आता मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

गुणरत्न सदावर्ते यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या काही गाड्यांची तोडफोड आज सकाळी काही व्यक्तींनी केली. ही तोडफोड करणारे मराठा आंदोलनातील सदस्य असल्याचा आरोप गुणरत्न सदावर्तेंनी केला आहे. त्यावर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरच थेट टीकास्र सोडलं आहे. या पार्श्वभूमीवर ही तोडफोड नेमकी कुणी केली किंवा करवून घेतली, यावर तर्क-वितर्क सुरू झाले असताना मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनस्थळी माध्यमांशी बोलताना त्यावर भूमिका मांडली.

“या प्रकाराचं आम्ही समर्थन करत नाही”

“आमचा समाज शांततेच आहे. सगळे मराठा समाजाच्या विरोधात जात आहेत. या समाजाचं वाटोळं व्हावं यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत. आमच्या जातीच्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत. पण आम्ही तरीही शांत आहोत. आंदोलन शांततेत चालू आहे, शांततेत चालू राहील. कुठेही उद्रेक करण्याचा उद्देश मराठा समाजाचा नाही”, असं जरांगे पाटील म्हणाले.

कुणाच्या गाड्या फोडल्या वगैरे मला माहिती नाही. पण तसं काही घडलं असेल, तर आपण त्याचं समर्थन करत नाही. कारण माझा मराठा समाज शांतताप्रिय आहे. शांततेत आंदोलन करत आहे. शांततेतच करत राहील. दुसऱ्या कुणीतरी हे केलं असेल. पण जर हे असं काही घडलं असेल, तर आपण त्या हल्ल्याचं समर्थन करत नाही”, असं ते म्हणाले.

“आता बघतोच कसं आरक्षण देत नाही”

“आम्हाला आरक्षण मिळू नये यासाठी खूप जणांचे प्रयत्न चालू आहेत. ४१ दिवस झाले तरी कायदा पारित होत नाही. दोन तासांत कायदा पारित होतो आणि टिकणारं आरक्षण मिळतं. फक्त ते द्यायची मनापासून इच्छा लागते. मराठ्यांच्या विरोधात हे सरकार म्हणून किती दिवस तुम्ही काम करणार? बघतो आम्ही तुम्ही आरक्षण कसं देत नाही. कसं देत नाही तेच आम्ही बघतो. मराठा लढण्यासाठी सज्ज आहे”, असंही मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

“यांचे कोण कोण श्रद्धेय मराठा समाजाला आरक्षण मिळू देत नाहीत हे सगळ्यांना माहिती आहे. मराठ्यांनी त्या श्रद्धेयांना खूप मोठं केलंय. ते मराठ्यांनीच मोठं केल्यामुळे सध्या विमानानं फिरतायत. त्यांची मुलं ऐषारामात जगतायत. आमची मुलं रात्रंदिवस अंधारात, चिखलात दारे धरतायत. सगळ्याच राजकीय पक्षांचे लोक आम्हाला मोठं होऊ देत नाही. तुम्हाला आरक्षण द्यायचंच नव्हतं तर कशाला महिन्याभराचा वेळ घेतला? तेव्हाच सांगायचं ना की ५० वर्षांचा वेळ लागेल. आता नाटकं शिकवताय का आम्हाला?” असा संतप्त सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments