Pune News: सौदी अरेबियात अडकलेल्या पुण्यातील तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. राज्य महिला आयोगामुळे हे करणे शक्य झाले आहे. नोकरीच्या बहाण्याने एकाच कुटुंबातील तीन महिलांना सौदी अरेबियात नेऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले होते.
पुणे: नोकरीच्या बहाण्याने एकाच कुटुंबातील तीन महिलांना पुण्यातून सौदी अरेबियाला नेऊन त्यांचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलांना मारहाण करून उपाशी ठेवण्यात येत होते. राज्य महिला आयोगाच्या प्रयत्नामुळे तीन महिलांची सुटका करण्यात यश आले. याप्रकरणी दलालांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलांना ओळखीच्या महिलेने सौदी अरेबियात कामासाठी जाण्याचा सल्ला दिला होता. या महिला मुंबईतील एका मध्यस्थाच्या मार्फत सौदी अरेबियात गेल्या. तेथील मध्यस्थाने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी घरकामासाठी पाठवले. मात्र, घरमालकांकडून त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच त्यांना वेतन नाकारून उपाशीही ठेवण्यात आले. पीडित महिलेला राज्य महिला आयोगाचा ईमेल आयडी मिळाला. यातील एका महिलेने तेथे ईमेल करून सुटका करण्याची विनंती केली. महिला आयोगाने तीन महिने सातत्याने प्रयत्न करून त्यांना मायदेशी आणण्याची प्रक्रिया राबवली.
0 Comments