-->

Ads

Nagpur News: भयंकर! तलावाजवळ फिरण्यासाठी गेले अन् अनर्थ घडला; ५ जीवलग मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू

 मोहगाव झिल्पी तलावात रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.


 महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहरातून एक भयानक घटना समोर आली आहे. रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेलेल्या ५ जिवलग मित्रांचा तळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. मोहगाव झिल्पी तलावात  रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

ऋषिकेश पराळे (वय २१, वाठोडा ) राहुल मेश्राम (वय २३, गीडोबा मंदिर चौक, वाठोडा), वैभव भागेश्वर वैद्य (वय २४, भांडेवाडी रोड, पारडी) शंतनू अरमरकर (वय २३) आणि नितीन नारायण कुंभारे अशी मृत तरुणांची नावे आहेत. पाचही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश पराळे हा प्राजक्त मोरेश्वर लेंडे (३२, रमना मारोती चौक) यांच्याकडे कारचालक म्हणून नोकरी करतो. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने ऋषिकेशने शंतनू, राहुल मेश्रामला सोबत घेऊन तळ्याकाठी जाण्याचा प्लान आखला.

ठरल्याप्रमाणे ऋषिकेश शंतनू, राहुल आणि अन्य मित्रासह मोहगाव झिल्पी तलावावर पोहचला. त्याने डॉ. प्राजक्त लेंडे आणि त्यांचा मित्र वैभव वैद्य या दोघांनाही तेथे बोलावले. दरम्यान, तलावात असलेले पाणी पाहून ऋषिकेश, शंतनू, राहुल आणि त्याच्या मित्राला पोहण्याचा मोह आवरता आला नाही.


चौघांनाही पोहणे येत नव्हते, तरीही ते एकमेकांच्या सहाय्याने तलावाच्या पाण्यात उतरले. सुरुवातीला तलावाच्या काठावर त्यांनी आंघोळ केली. मात्र, ऋषिकेश खोल पाण्यात गेला. त्याच्या पाठोपाठ अन्य तिघे गेले. चौघेही बुडायला लागले. त्यामुळे वैभव वैद्य हा त्यांना वाचवायला गेला. तोही बुडाला. हे सर्व तरुण प्राजक्तच्या समोर बुडाले.


दरम्यान, याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. तसेच उर्वरित तिघांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी रात्री उशिरा पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.






Post a Comment

0 Comments