-->

Ads

'पोलिसांनी कुलूप तोडलं, आम्ही किचनमध्ये गेलो, चार बादल्यांमध्ये मृतदेहाचे तुकडे होते'

दिल्लीचं श्रद्धा वालकर हत्याकांड ताजं असतानाच क्रूरतेचा कळस गाठणारी घटना मुंबई जवळील ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरात घडली आणि एकच खळबळ उडाली. 


3 जून रोजी 32 वर्षीय सरस्वती वैद्यची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 20 हून अधिक तुकडे करण्यात आल्याचं समोर आलं. इतकंच नाही तर प्रेशर कुकरमध्ये मृतदेहाचे तुकडे शिजवून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्नही आरोपीने केला.

हे हत्याकांड मीरा रोडच्या 'गीता आकाशदीप' इमारतीत काही दिवसांपूर्वी घडलं. सरस्वती वैद्य सोबत राहणा-या तिच्या पार्टनरनेच ही हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.

2015 साली 56 वर्षीय मनोज साने आणि 32 वर्षीय सरस्वती वैद्य मीरा रोडच्या 'गीता आकाशदीप' या इमारतीत रहायला आले.

शेजारच्या तरुणाला 'या' कारणामुळे आला संशय

एका शेजाऱ्याने आम्हाला सांगितलं की, "सोमवारपासूनच (3 जून) आम्हाला दुर्गंध येत होता. आम्हाला कळत नव्हतं की हा कुजलेला वास कुठून येतोय. आम्ही आपआपल्या घरांमध्ये उंदीर किंवा पक्षी मेलाय का हे तपासलं. मजल्यावरील तीन खोल्यांमध्ये आम्ही पाहिलं पण काहीच मिळालं नाही. पण दुर्गंध एवढा वाढला की आम्हाला जेवणही जात नव्हतं"

मजल्यावरील 704 क्रमांकाची खोली सोडून रहिवाश्यांनी सगळीकडे पाहिलं पण कुठेही उंदीर किंवा एखादा पक्षी मेल्याचं आढळलं नाही.

मनोज साने आणि सरस्वती वैद्य कोणाशीही बोलत नसत, कधीही रहिवाशांमध्ये मिसळत नसत, त्यांचा दरवाजाही कधी उघडा नसतो त्यामुळे त्यांच्या खोलीत आम्हाला तपासता आलं नाही, असंही ते म्हणाले.

पण पुढच्या 24 तासांत दुर्गंधी प्रचंड वाढली. असह्य होऊ लागल्याने 704 खोलीच्या समोरच राहत असलेल्या तरुणाने त्यांचा दरवाजा ठोठावला. पण समोरून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

याच तरुणाला मनोज साने इमारतीखाली अचानक दिसला. तोंडावर मास्क आणि हेल्मेट घालून तो बाहेर चालला होता.

या तरुणाने आम्हाला सांगितलं, "मी त्यांना विचारलं की, खूप घाण वास येतोय. तुमच्या घरात आपण तपास करूया की कुजलेला वास कुठून येतोय. पण मनोज साने म्हणाला की मी बाहेर जातोय. रात्री साडे दहानंतर येणार. वास बाजूच्या इमारतीतून येत असेल किंवा घाण पाण्याचा असेल."

हा संवाद इथेच थांबला.

सगळीकडे तपासलं पण दुर्गंध काही जाईना यामुळे रहिवासी अस्वस्थ झाले. त्यांनी तातडीने सोसायटीच्या समितीच्या अध्यक्षांना फोन केला. त्यांनी मिळून मनोज सानेला ज्या एजंटने खोली मिळवून दिली त्याला फोन केला. एजंटही पुढच्या अर्ध्या तासात पोहचला.

कधीही कोणाशीही दोन शब्दही न बोलणाऱ्या मनोज सानेवर रहिवाशांनाही संशय येऊ लागला. त्याच्या खोलीजवळ गेल्यावर अधिक दुर्गंध येतो असंही सगळ्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तातडीने नया नगर पोलीस स्टेशनला फोन केला आणि काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहचले.

'मी पाहून हादरलोच'

पोलिसांनी कुलूप तोडलं आणि पोलीस खोलीत घुसले. पोलिसांसोबत शेजारी राहणारा तरुण सुद्धा होता.

या तरुणाने आम्हाला सांगितलं, "खोलीत जाताच असह्य वास येत होता. त्याच्यासोबत राहणारी महिलाही कुठे दिसत नव्हती. कुजलेला वास येत असल्याने पोलिसांनाही लगेच शंका आली. त्यांनीही व्हीडिओ रेकाॅर्डिंग सुरू केलं. आम्ही आधी हाॅल पाहिला पण काहीच आढळलं नाही. यानंतर बेडरुममध्ये बेडवर काळ्यारंगाचं प्लॅस्टिक पसरलेलं होतं. मला वाटलं की या खाली मृतदेह असेल पण तिथेही काही नव्हतं."

"दुसर्‍या बेडरुममध्येही काही सापडलं नाही. मग आम्ही किचनमध्ये गेलो आणि मी हादरलोच. किचनमध्ये चार बदल्यांमध्ये मृतदेहाचे ओळखताही येणार नाही असे तुकडे कापलेले दिसले. किचनच्या बेसिनमध्ये हाडं होती. हे सगळं भयंकर होतं. पोलिसांनी त्यांची प्रक्रिया सुरू केली,"

"आम्ही आता मनोज सानेची वाट पाहत होतो. पोलिसांनी आम्हा शेजा-यांना सांगितलं की तुम्ही कोणालाही काहीच कळवू नका. पोलीस बाईकवर आले होते त्यामुळे इमारतीखाली पोलिसांची गाडी नव्हती. जवळपास रात्रीच्या 8. 30 वाजता साने इमारतीत पोहचला. पोलीस आलेत याची त्याला कल्पना नव्हती,"

"तो लिफ्टने सातव्या मजल्यावर पोहचला. लिफ्टचा एक दरवाजा उघडताच समोर उभ्या असलेल्या एजंटने त्याला ओळखलं आणि तो म्हणाला हाच आहे तो ज्याला मी रुम दिली. हा मनोज साने आहे. पोलिसांनी तात्काळ त्याला आपल्या ताब्यात घेतलं,"

दरवाजा बंद करून पोलिसांनी आपला तपास सुरू केला. सुरुवातीला त्याने सांगितलं की,"हे कुठल्यातरी जनावराचे तुकडे आहेत."

'लिफ्टमध्ये दिसली की पाहून हसायची'

सरस्वतीच्या अगदी समोरच्या खोलीत राहणाऱ्या श्रीवास्तव कुटुंबातील महिलेशी आम्ही संवाद साधला.

दोन दिवसापासून झोप उडाली आहे. तिचा हसरा चेहरा सारखा डोळ्यासमोर येतोय असं सांगत त्या भावनिक झाल्या.

"तिला काही त्रास दिला जात होता का माहिती नाही पण तिने मदत मागितली असती, ती काही बोलली असती तर आम्ही तीन कुटुंबांनी मिळून तिला नक्की मदत केली असती," असं त्या म्हणाल्या.

त्या पुढे सांगतात, "ती कधीच माझ्याशी किंवा इतर शेजा-यांशीही कधी बोलली नाही. कधीतरी लिफ्टमध्ये दिसली की पाहून हसायची. भाभी कैसे हो? असं मी विचारल्यावरही मान हलवून स्मित हास्य करायची आणि निघून जायची. त्यांच्या घरातून कधी भांडणाचाही आवाज आला नाही. यामुळे आम्हालाही कधी संशय आला नाही की ती अडचणीत आहे किंवा त्रासात आहे."








Post a Comment

0 Comments