-->

Ads

फक्त 20 रुपयांसाठी तरुणाची चाकूने सपासप वार करून हत्या, उल्हासनगर हादरलं

जय जनता कॉलनीमधील एका गल्लीत अमली पदार्थांची सेवन करीत नशा करण्यासाठी बसला होता. याच वेळी रस्त्याने जाणाऱ्या अनिलकडे त्याने 20 रुपये मागितले.



    उल्हासनगर, 24 मे : 
    उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) गुन्हेगारीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. अवघे 20 रुपये देण्यास नकार दिल्याने एका तरुणाची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प 5 च्या जय जनता कॉलनी (Jai Janata Colony) परिसरात ही घटना घडली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल आहुजा असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनिल हा चहा च्या दुकानावर कामाला असून कुटुंबासोबत तो जय जनता कॉलनी परिसरात राहतो. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी साहिल मैराळे हा जय जनता कॉलनी मधील एका गल्लीत अमली पदार्थांची सेवन करीत नशा करण्यासाठी बसला होता. याच वेळी रस्त्याने जाणाऱ्या अनिलकडे त्याने 20 रुपये मागितले. मात्र, अनिलने 20 रुपये देण्यास नकार दिला.


    याचा आरोपी असलेल्या साहिलला राग आला. त्याने रागाच्या भरात कमरेला असलेला चाकू काढून अनिलच्या अंगावर अनेक ठिकाणी सपासप वार केले. दरम्यान वार केल्यानंतर आरोपी साहिल पळून गेला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनिलला स्थानिकांनी तात्काळ उल्हासनगरच्या  मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी अनिलला तपासून मृत घोषित केले. अनिलच्या हत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


    या हत्येची माहिती उल्हासनगर हिललाईन पोलिसांनी मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घटनेचा पंचनामा  करून तात्काळ आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले. डी बी पथकातील अजय गायकवाड, अजय अहिरे, शेखर पाटील, विक्रम जाधव आणि नवनाथ काळे यांनी अवघ्या 2 तासात आरोपी साहिलला कॅम्प 4 च्या सर्टिफाईट ग्राउंड जवळून ताब्यात घेतले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या कमरेला चाकू आढळून आला.  या हत्येप्रकरणी हिललाईन पोलिसांनी आरोपी साहिलला अटक केली असून त्याच्या विरोधात कलम 302,504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गुन्हे पोपट करडकर हे करत आहे.

    Post a Comment

    0 Comments